Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

पंडित काशीराज यांच्या जबानीतून पानिपताची मसलत..




मित्रांनो,

पानिपतच्या युद्धात अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दाली याच्या पक्षातील प्रमुख हिंदुस्थानी सत्ताधीश अयोध्येचा नवाब सुजा उद्दौला याचा कारभारी काशिराज हा महाराष्ट्रीय गृहस्थ शुजा उद्दौल्या सोबत इ. स. १७६१ मध्ये पानीपतच्या मैदानावर हजर होता. काशीराज आपल्या ग्रंथात लिहितो-

हरहुन्नरी मुत्सद्दी सदाशिवराव भाऊ-

“दख्खनच्या रियासतीच्या मसनदीवर असलेला बाळाराव पंडित प्रधान हा शहाणा, दूरदर्शी आणि भाग्यवान होय अशी त्याची ख्याति हिंदुस्थानातील जनतेत होती. पण त्याचा स्वभाव विलासी होता. हे सुद्धा त्याच्या चातुर्याचे आणि बुद्धिमत्तेचे लक्षण होय असे लोक म्हणत. घरात भांडण तंटे नकोत म्हणून त्याने राज्याचा कुल कारभार आपला चुलतभाऊ सदाशिवराव भाऊ याजकडे दिला होता. आणि तो स्वतः आरामात काळ घालवीत

होता. सदाशिवरावभाऊने लहानपणापासूनच रामचंद्र बाबा शेणवी या अप्रतिम मुत्सद्याच्या हाताखाली, मुल्की कामे, आर्थिक प्रकरणे, मुलुखगिरी, फौजफांटा इत्यादि राज्यकारभाराच्या प्रत्येक अंगाचे शिक्षण घेतले होते. सर्व गोष्टीत त्याने प्राविण्य संपादन केले. आपल्या भाग्याने तो सर्वत्र प्रसिद्ध झाला. मध्यरात्रीपर्यंत तो प्रत्येक लहान मोठ्या प्रकरणात लक्ष घालीत असे. प्रत्येक प्रकरणाचा तो एखाद्या पोक्त आणि अनुभवी मुत्सद्याप्रमाणे निकाल लावी. सारेजण एकमुखाने त्याची बुद्धी विलक्षण आहे असे म्हणत. या काळात उत्तर हिंदुस्थानातील आणि दक्षिणेतील अनेक प्रकरणे त्याच्या हातून तडीस गेली.”


रघुनाथ रावांची अटक मोहीम-

“योगायोगाने उत्तर हिंदुस्थानची मोहीम काढून तिचे आधिपत्य रघुनाथरावाकडे द्यावे असे ठरले. रघुनाथरावांच्या बरोबर मल्हारराव होळकर, जयाजी(साबाजी) शिंदे बगैरे सरदार देण्यात आले. त्यांच्याबरोबर प्रचंड सैन्य होते. उत्तर हिंदुस्थानातील सगळी प्रकरणे निकालात काढून हे सैन्य लाहोर आणि गुजरात शहादूला या भागात पोहोचले. शहा अब्दालीचे सरदार जहानखान आदींचा मराठ्यांच्या हातून दणदणीत पराजय झाला. ते अटक नदी पार करून गेले. मराठ्यांच्या फौजेने अटक नदीपर्यंत त्यांचा पाठलाग केला, आणि त्यांनी त्या भागात आपला काही काळ अंमल बसविला. मोहीम पार पडली. तसा फौजेच्या पगारबाकीचा प्रश्न पुढे आला. रघुनाथराव सल्ला घेऊन परत फिरला आणि दक्षिणेकडे निघून गेला.”


सदाशिवराव भाऊ आणि रघुनाथराव यांची खडाजंगी, मोहिमेचे नेतृत्व भाऊंकडे-

“रघुनाथरावाच्या मोहिमेचे जमाखर्च भाऊने तपासले तो त्यास आढळून आले की खंडणी पेशकश इत्यादीच्या रूपाने जी रक्कम वसूल झाली त्यामानाने अठ्याऐंशी लाख रुपये पगार बाकी आणि इतर कर्ज झाले होते. भाऊ हा रघुनाथरावाहून प्रत्येक बाबतीत श्रेष्ठ होता. त्याने रघुनाथरावाला टोचून म्हटले की हीच का तुमची कार्यकुशलता. आमच्याकरिता कर्ज मात्र करून आलात. रघुनाथरावाने पण उत्तर दिले की या पुढे आपणच मोहिमात लक्ष घालून व्यवस्थित खर्च करावा. या सवालजबाबात बाळाराव मध्ये पडला. रघुनाथराव त्याचा भाऊच होता. त्याचा विचार करून बाळारावाने म्हटले की रघुनाथराव पोर आहे. पुढे त्याला अनुभव येईल.

यानंतर तिसऱ्या वर्षी हिंदुस्थानात मोहीम व काढण्याचा मन्सुबा ठरला. त्या संबंधी रघुनाथरावास विचारण्यात आले. पण त्याने नकार देऊन म्हटले की ते दौलतीचे हितचिंतक आणि व्यवस्थित जमाखर्च करणारे आहेत.

त्यांच्याकडे मोहीम द्या. रघुनाथरावाचे बोलणे भाऊस लागले. अनेक दृष्टीनी विचार करून ती मोहीम आपल्या अंगावर घेण्याचे त्याने कबूल केले. पूर्वापार पद्धतीप्रमाणे बाळारावाचा सतरा वर्षाचा मुलगा विश्वासराव यास सरदार करून त्याने बरोबर घेतले.”


भाऊंची शिस्त आणि कारभाऱ्यांची चलबिचलता-

“..आणि प्रचंड सैन्य बरोबर घेऊन चालत असलेल्या पद्धतीस सोडून आपले नवीनच कायदे कानू चालवू लागला. मुलकी प्रकरणात, आमिलांचे जमाखर्चाचे हिशेब तपासण्यात तो आपल्या मनासारखे आणि कडकपणे वागू लागला. मल्हारराव वगैरे सरदार उत्तर हिंदुस्थानातील व्यवहारात अनुभव घेतलेले होते. तिकडील राजेरजवाड्यांशी त्यांची घसट होती. त्यांची सल्लामसलत न घेता तो आपल्याच पद्धतीने वागू लागला. असे होत होत भाऊ सिरोंज प्रांतांत येऊन पोहोचला. तेथून त्याने हिंदुस्थानातील सरदारांपाशी वकील

पाठविले. राजेरजवाडे, अमीरउमराव यापैकी प्रत्येकाला त्याने मूल्यवान भेटी पाठविल्या. आणि त्यांना पत्रे लिहिली की तुम्ही आम्हाला येऊन मिळावे. म्हणजे एकत्र येऊन आपण हिंदुस्थानची प्रकरणे निकालात काढू. एक वकील शुजाउद्दौल्यापाशी आला. त्याने मूल्यवान वस्त्रे आणि रत्नजडित अलंकार भेटीदाखल आणले. त्याने भाऊचा वरील निरोप आणिला. आणि शुजाउद्दौल्ल्यास सांगितले की भाऊजवळ येताच ते तुम्हाला आणण्याकरिता नारोशंकर यास पाठवतील.

शुजाउद्दौल्याने वरील निरोपाला व्यवहाराला धरून जे उत्तर होते ते दिले. पण त्याने आपल्या मनाशी ठरविले की उमयपक्षात काय घडते ते पाहात आपण वेगळे राहावे. ज्या पक्षाला जय मिळण्याचा रंग दिसेल त्याला जाऊन मिळता येईल, मग तो पक्ष कोणता का असेना.

दत्ताजी पटेलवर जय मिळविल्यानंतर अहमदशहा अब्दालीने अनूपशहर भागात गंगेच्याकाठी दुआबात छावणी केली होती. दत्ताजी पाटील(दत्ताजी शिंदे) हा नजीबुदौल्याच्यामुळे युद्धात मारला गेला होता. पुढे काय होईल या भीतीने नजीबुदौला अहमदशहा दुराणीला मिळाला होता. सरदार जहानखानाच्या पराजयाच्या पराजयाचा सूड घ्यावा असे अहमदशहानेही ठरविले होते. पण तो हिंदुस्थानात येण्याचे मुख्य कारण म्हणजे नजीबुदौल्याने त्याला बोलाविले हेच होय. अहमदशहाच्या पावसाळी छावणीसाठी आणि इतर व्यवस्थेकरिता लागणारी रक्कम नजीबुदौल्याने अहमदशहापाशी पाठविली, नजीबुदौला हा युद्धात आणि राजकारणात पूर्णपण मुरलेला होता. सगळे रोहिले सरदार आणि फरुखाबादेचे अफगाण हे नजीबुदौल्याच्या सल्ला मसलतीने आणि स्वजातीच्या अभिमानाने शहा दुराणीला मिळाले.”


भाऊचा गर्व की आत्मविश्वास-

“सदाशिव भाऊची स्वत:ची फौज होती. याशिवाय त्याने नारोशंकर वगैरे माळव्यातील आणि झाशी प्रांतातील अधिकारी होते त्यांच्या फौजाही बरोबर घेतल्या. तो चंबळ नदीच्या काठावर पोहोचला. तेथून त्याने राजा सूरजमलला येऊन भेटण्यासंबधी निरोप पाठविला. सूरजमलने उत्तर दिले की नेहमी राव मल्हार आणि शिंदे यांच्या मार्फतीने आमचे जाबसाल होत. त्यांना मध्ये घालावे म्हणजे मी हजर होईन. असे करणे जरूर आहे हे पाहून भाऊने शिंदे होळकरांच्या मध्यस्थीने सूरजमल बरोबर कौल करार केला. त्यानंतर ता चंबळ ओलांडून अकबराबाद आम्याजवळ पोहोचला. तेथे राजा सूरजमल जाट हा येऊन त्याला भेटला. उभयतात सल्ला मसलत झाली. सूरजमलने म्हटले-

“तुम्ही सगळ्या हिंदुस्थानचे स्वामी आहात. आणि मी एक जमीनदार आहे. माझ्या योग्यतेप्रमाणे मी म्हणेन की तुमची युद्धसामग्री, बाजारबुणगे, जाडजूड तोफांचा कारखाना ही या युद्धात उपयोगी पडणार नाहीत. हिंदुस्थानातील लोकांत तुम्ही सर्वापेक्षा तडफदार आहात. पण प्रतिस्पर्धी तुमच्यापेक्षाही जास्त तडफदार आहे. म्हणून माझा सल्ला असा आहे की तुम्ही सड्या सैन्याने शत्रूवर चालून जावे. आणि तुमचे जड सामान चंबळ नदीच्या पलीकडे तुमच्या ताब्यात असलेल्या झांशी किंवा ग्वालियर या ठिकाणी ठेवावे.

दुसरा सल्ला असा की माझ्या पाशी दीग आणि इतर असे चार किल्ले आहेत. या पैकी तुम्हाला जो किल्ला पसंत पडेल तो मी रिकामा करून देईन. त्यात तुम्ही आपले कबीले आणि जाड सामान ठेवा. मी तुमची सोय करण्यास तयार आहे. यात चांगली गोष्ट ती ही की आपला मुलूख पाठीशी राहील. आणि रसदेची काळजी राहाणार नाही. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी न करता शत्रूशी मुकाबला करू शकाल. शत्रूच बहुतेक चाल करून येणार नाही. मोहिमेचा हा रंग पाहून शत्रू जागच्याजागी बसून राहील."

मल्हारराव वगैरे सरदारांना हा सल्ला पटला. ते म्हणाले “तोफखाना घेऊन युद्ध करणे ही बादशाही पद्धत झाली. आम्ही मराठे गनिमी काव्याने लढणारे आहोत. आपल्या पद्धतीने लढणे बरे, हा मुलूख म्हणजे काही आमचा

मिराशी मुलूख नव्हे. येथे आम्हाला पुढे जाता आले नाही तर पाय मागे घेण्यात काही नामुष्की नाही. सूरजमलचा सल्ला योग्य आहे. त्यायोगे शत्रू आपण होऊनच माघार येईल. तो सध्या या देशात आहे. तो कसा तरी काळ काढील. पावसाळाही आता जवळ आला आहे. या वेळी तो निघून जाणार नाही. पण नंतर मात्र तो आपण होऊन आपल्या मुलुखाकडे निघून जाईल.”

सगळ्या सरदारांनी एकमुखाने हा सल्ला दिला. भाऊला आपल्या सैन्याचा आणि पराक्रमाचा गर्व होता. त्याने तो सल्ला मानला नाही. तो म्हणाला, “आमच्या सेवकांनी या प्रांतांत मोठी कामे केली आहेत. हेतु हा की हा मुलूख मिळवावा. आम्ही काही निष्क्रिय म्हणून लोकात प्रसिद्ध होऊ इच्छीत नाही. मल्हारराव म्हातारा झाला आहे. त्याची बुद्धी नष्ट झाली आहे. सूरजमल आपल्या योग्यतेप्रमाणे बोलला. त्याची हुशारी ती किती. आम्ही त्याच्या

सल्ल्याप्रमाणे काय म्हणून वागावे."

अशा प्रकारे भाऊ कडकपणे बोलला. भाऊच्या अशा बोलण्यावरून अनुभवी आणि पोक्त माणसांनी ओळखले की दुर्दैवच ओढवले आहे म्हणून भाऊ शहाणा आणि दूरदर्शी असूनही चांगला सल्ला ऐकत नाही. त्याच्या कठोर

बोलण्याने प्रत्येक सरदार दिलगीर आणि कष्टी झाला. त्यांनी मनाशी विचार केला की या ब्राह्मणाला जय न मिळणे हेच बरे. नाहीतर आमची कदर ती काय राहाणार?..”

... अशाप्रकारे काशीराजांने आपली अनुभूती लेखनबद्ध केली आहे. तो मराठा साम्राज्यात बाळाजी बाजीराव पेशव्याचे विलासी जीवन रेखाटतो. अर्थात केंद्र सत्तेचा कमकुवतपणा सांगून जातो. तसेच भाऊचे महत्त्वाचे स्थान, भाऊची तडफ, रघुनाथ राव पेक्षा भाऊची असलेली योग्यता सांगून जातो. 

याशिवाय राजकीय मसलती मध्ये भाऊचा एकाधिकार व आत्मविश्वास ज्याला काशीराज हट्ट आणि गर्व संबोधतो. जाट राजा सुरजमलची प्रत्यक्ष युद्धात न उतरण्याची मनीषा आणि मराठा कारभाऱ्यातील हेवा देवा मांडून जातो.

असो, राजकारण आणि युद्धकारण सोबत चालतात जरूर मात्र युद्धाचा परिणाम राजकारणावरच ठरतो हे नक्की.!

संदर्भ स्रोत: सेतू माधव पगडी

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts