Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

साहबे फुतूहाते उज्जाम



"साहबे फुतूहाते उज्जाम" असा थोरले बाजीराव पेशवे यांचा उल्लेख करणारा ग्रंथकर्ता म्हणजे मिर्झा मुहंमद.! मिर्झा मुहंमद याला ग्रंथवाचनाचा छंद होता. यातूनच इस्लामच्या उदयापासून तो १७४८ पर्यंत होऊन गेलेले प्रमुख मुसलमान बादशहा, सुलतान, नबाब, अमीर-उमराव, धर्मशास्त्रज्ञ, हकीम, पंडित इत्यादींचे मृत्युशक गोळा करून ते टिपून ठेवण्याची त्याला सवय लागली. सहाशे वर्षांचा एक खंड या हिशेबाने त्याच्या या शकावलीचे दोन खंड मिर्झा मुहंमदच्या हस्ताक्षरातील असून ते रामपूरच्या रिजा ग्रंथालयात सुरक्षित आहेत. या ग्रंथाचे नाव 'तारीखे मुहंमदी' असे आहे. त्याबद्दल दुर्मिळ आणि महत्त्वाची माहिती इतिहासाचार्य सेतू माधव पगडी यांनी लिहून ठेवली आहे त्याबद्दल त्यांचे शतशः आभार.!

मिर्झा मुहंमद याचे घराणे मध्य आशियातील. त्याचा पणजा अब्दुल जलील बक्षी हा मध्य आशियातील. त्याचा मुलगा कुबादबेग हा कंधार येथे स्थायिक झाला. औरंगजेबाने त्याला दियानतखान ही पदवी दिली. दियानतखानाचा मृत्यू इ. स. १६७२ मध्ये झाला. त्याचा मुलगा रुस्तुम ऊर्फ मुअतमदखान हा औरंगजेबाच्या पदरी होता. इ. स. १७०५ मध्ये औरंगजेबाने वाकिणखेड्याला वेढा घातला होता. त्या सुमारास मुअतमदखान हा छावणीत वारला.  मिर्झा मुहंमद हा त्याचा मुलगा.

मिर्झा मुहंमद याचा जन्म ४ एप्रिल १६८७ रोजी झाला. तो सोळा वर्षांचा झाला तेव्हा इ. स. १७०३ मध्ये रुहुल्लाखान बक्षी याने त्याला औरंगजेबासमोर आणले. औरंगजेबाने त्याला दीडशेची मन्सब दिली.

मिर्झा मुहंमद याच्या काळातील घटनांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांस उपयुक्त आहेत. म्हणून रामपूरचे विद्वान व्यासंगी ग्रंथपाल इम्तियाज अली अर्शी यांनी हिजरी ११०१ ते हिजरी ११६१ म्हणजे पाच ऑक्टोबर १६८९ ते तेवीस सप्टेंबर १७४८ या काळातील नोंदी एकत्र केल्या आणि त्यांच्या गुणदोषांची चर्चा करून त्यांचे उत्कृष्ट संपादन केले. हा ग्रंथ अलीगड विद्यापीठातर्फे १९७३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

ग्रंथात आपल्याला विविध व्यक्तींच्या मृत्यूंच्या तारखा कोठून मिळाल्या याचे संदर्भ मिर्झा मुहंमदने दिले आहेत. जेथे तारखा मिळू शकल्या नाहीत तेथे मृत्यूचे वर्ष दिले आहे.

नोंदी मृत्यूपुरत्या असल्या तरी मधून मधून या नोंदीच्या निमित्ताने मिर्झा मुहंमद हा त्या व्यक्तीसंबंधाने थोडक्यात आपले मत मांडतो. समकालीनाचे मत म्हणून ते अभ्यासकांना उपयुक्त ठरते. याची दोनच उदाहरणे पाहा : राजाराम महाराजांच्या मृत्यूची नोंद घेताना मिर्झा मुहंमद हा पुढीलप्रमाणे लिहून गेला आहे :

शहाजीचा नातू व शिवाजीचा मुलगा रामाजी ऊर्फ रामराजा याने आपला भाऊ संभाजी याच्या मृत्यूनंतर दक्षिणेत मोठे तेज व धाडस दाखविले (कर्रोफर नमूदा). कर्र म्हणजे शत्रूवर हल्ले चढविणे, फर म्हणजे तेज, दबदबा.

राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळी मिर्झा मुहंमद हा तेरा वर्षांचा असून औरंगजेबाच्या छावणीत होता, हे पाहिले तर राजाराम महाराजांबद्दल ‘कर्रौफर' - अर्थात बेडर हल्ले करणे व दबदबा निर्माण करणे हे शब्द बरेच काही सांगून जातात. 

मोगलांचे प्रचारतंत्र काही म्हणो, सामान्य मोगलांचे राजाराम महाराजांसंबंधीचे मत वरील शब्दातून व्यक्त झाले आहे. 

याच ग्रंथात दुसरे उदाहरण थोरले बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूच्या नोंदी विषयी आहे. मिर्झा मुहंमद म्हणतो : 

'दक्षिणी ब्राह्मण बाळाजी विश्वनाथ याचा मुलगा बाजीराव मराठ्यांचे प्रमुख राजे शाहू यांचा सेनापती व प्रचंड विजय मिळविणारा (साहबे फुतूहाते उज्जाम) - नर्मदेच्या काठावर मृत्यू दहा सफर ११५२ हिजरी (सव्वीस एप्रिल १७४०) वय चाळिशीच्या आत.' 

साहबे फुतूहाते उज्जाम" -अर्थात प्रचंड विजय मिळविणारा सेनापती" बाजीरावाच्या कामगिरीचे याहून चांगले मूल्यमापन क्वचितच करता येईल. 

असा हा ग्रंथ उपयुक्त ऐतिहासिक साधन ग्रंथ आहे. शत्रु कडील लेखक असून सुद्धा तो साकी मुस्तैद खान किंवा खाफीखान यांच्या प्रमाणे तो मत्सर भावाने मत मांडत नाही हे विशेष.! शेवटी लेखणीतून लेखकाचीच शाई व्यक्त होत नाही काय..? म्हणून न्याय बुद्धीने लिहिणारी लेखणी व सत्य परिस्थिती व्यक्त करणारी शाई महत्त्वाची ठरते.!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts