Skip to main content

Featured

कनकादित्य सूर्य मंदिर कशेळी

मित्रांनो, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कोकणच्या निरागस आणि दिव्यभूमीला स्पर्श करण्याचा योग आला. आदित्य म्हणजे सूर्य. तसे सूर्य मंदिर भारताबाहेरही आढळतात. त्यापैकी भारतात ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आन अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्...

‘डिग बॉय डिग’



हा होता भारताचा पारतंत्र्याचा काळ. युरोप अमेरिका आणि रशिया आपापली साम्राज्ये वाढवण्यासाठी जगभरात हात पाय पसरत होती ते विविध खनिजे व धातू गोळा करण्यासाठी. आपले साम्राज्य आणि व्यापार अबाधित ठेवण्यासाठी आरमारी आणि व्यापारी नौकांना इंधन म्हणून लागणारा दगडी कोळसा म्हणजे शक्तीचे प्रतीक होतं पण आता काळ बदलू लागला. आणि आता राष्ट्राची शक्ती वाढवण्यासाठी रक्त बनवून वाहणार होतं ते वसुंधरेच्या पोटातील तेल.!

या राष्ट्रांनी दूर दूर जाऊन धरतीच्या पोटातलं तेल काढून रिफायनरीज बांधण्याचे काम झपाट्याने सुरू केलं होतं.

कॅनडा, अमेरिका, रशिया, जावा सुमात्रा आदि देशांमध्ये झपाट्याने तेल विहिरी खनण्याचे आणि रिफायनरी बांधण्याचे काम सुरू होते. पहिल्या महायुद्धाच्या पराभवाचे कारण सांगताना जर्मनीचा सर्वोच्च सेनापती जनरल लुडेनडॉर्फ म्हणतो की ‘आम्हाला तेलाने हरवले’. कारण सर्व दोस्त राष्ट्रांना तेलाचे मुबलक साठे उपलब्ध होते तर जर्मनीकडे तेलाचा काळ पडला होता.

इंग्लंडमधील भाषणामध्ये बोलताना लॉर्ड कर्झन म्हणाले,‘दोस्तांचा विजय या युद्धात स्वार होऊन आला तो तेलाच्या लाटेवर’. फ्रान्सच्या कमिटी जनरल पेट्रोलचे प्रमुख बेरेंगर म्हणाले,‘हे तेल म्हणजे वसुंधरेचा रक्त आहे. दोस्तांची विजयगाथा या रक्ताने लिहिली गेली आहे’.

अमेरिकेतील सुप्रसिद्ध तेल व्यापारी रॉकफेलर यांची ‘स्टॅंडर्ड ऑइल’ कंपनी,

रशियातील ‘रॉथशिल्ड ऑइल कंपनी’

इंग्लंडची ‘शेल कंपनी’,

डचांची जावा सुमात्रा या भागातील ‘रॉयल डच ऑइल कंपनी’आणि ब्रिटिशांची ब्रह्मदेशातील ‘बर्मा ऑइल कंपनी’ ‘अँग्लो-पर्शिअन ऑइल कंपनी’ या ऑइल कंपन्या कार्यरत होत्या. त्याकाळी भारतात वापरलं जायचं ते तेल बर्मा ऑइल कंपनीच.!

पण या काळात ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेला हिंदुस्थान मात्र वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता. मुळात स्वातंत्र्य गेले की सारं लयाला जाते. ब्रिटिशांची हुकमी सत्ता आणि संस्थानिकांच्या पेन्शनरी या बाबी सोडल्या तर आर्थिक मंदी, खालावत जाणारे जीवनमान या दैनंदिन समस्या बनल्या होत्या.

अशावेळी जगात चाललेले व्यापारीकरण, औद्योगीकरण, तंत्रज्ञान विकास या गोष्टी आम्हाला अवगत असल्या तरी नशिबात नव्हत्या. मग भारतात तेल विहिरी खणल्या गेल्याच नाही असे नाही. सन १८६६ मध्ये मॅक्लीलॉफ स्टुअर्ट या कंपनीने आसामात तेल विहिरी खनण्याचा प्रयोग करून पाहिला होता. मात्र त्याला व्यवहारिक यश प्राप्त झालं नव्हतं. म्हणून तेल क्षेत्रातल्या पहिल्या यशस्वी प्रयोगाची नोंद जाते ती ‘आसाम रेल्वे ट्रेडिंग कंपनी’ च्या नावाने.

तर ही कथा अशी आहे की, त्यावेळी एक कॅनेडियन इंजिनियर हिंदुस्थानात आसाम रेल्वे ट्रेडिंग कंपनी चे काम बघत होता. डब्ल्यू एल लेक असे त्याचे नाव. त्यावेळी आसाम राज्यातील दलदली व जंगलमय प्रदेशात रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरू होते.

असेच एका ठिकाणी रेल्वे मार्गासाठी खोदकाम सुरू असताना लेकच्या नजरेस एक गोष्ट पडली.! खोदकामात सामान वाहून नेणाऱ्या हत्तींची पावलं चिखलाने माखलेली होती. मात्र हत्तीच्या पायांवर तेलासारखा तवंग निर्माण झाला होता. कुतूहल आणि निरीक्षण करणाऱ्या लेकच्या लक्षात आले की इथल्या जमिनीत काहीतरी वेगळाच पदार्थ मुरत असावा. त्याने आपल्या मजुरांना गोळा करून त्या भागामध्ये उत्खनन सुरू केले. ‘डिग बॉय डिग’ असे सारखे ओरडणाऱ्या लेकच्या मनात संशय दाटू लागला. जमिनीतली दल दल वर येऊ लागली आणि लेक चा संशय खरा ठरत गेला.! हिंदुस्तानच्या धरतीवरचा तेलाचा साठा हाती लागला होता.!

आणि लेकचे ते शब्द ‘डिग बॉय डिग’ हे प्रसिद्ध होऊन गेले ते ‘दिग्बोई’ (अर्थात ‘डिग बॉय डिग’) या नावाने. आणि सन १८९२ मध्ये आशियातील पहिली तेल रिफायनरी हिंदुस्तानच्या भूमीवर उभी राहिली ती येथेच.! यातील विहिरीची खोली जवळपास ६०० फूट इतकी होती. रॉकेल, रेल्वे यंत्रसामग्रीचे वंगण व मेन आदींचे उत्पादन या कारखान्यातून होऊ लागलं.

खरे तर आसाम रेल्वे ट्रेडिंग कंपनी ही काही तेल कंपनी नव्हती. पण तरीही या क्षेत्रात विहिरी खणण्याचे काम या कंपनीने हाती घेतले. त्यासाठी कंपनीने प्रथम तत्कालीन आसाम आयुक्तांकडे विहिरी खणण्याची परवानगी मागितली. पण आसामच्या पर्यावरणाला धोका निर्माण होईल असं कारण देत आयुक्तांनी तेल विहिरी खणण्याची परवानगी नाकारली. मात्र परवानगी मिळेल या विश्वासाने कंपनीने विहिरी खोदकामाला सुरुवात केली. पण आपल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी पत्र पाठवून व्हाईसरॉयच्या कानी घातली. कंपनी यशस्वी झाली आणि मुबलक प्रमाणात तेलाचे उत्पादन सुरू झाले. पुढे त्यांनी ‘आसाम ऑइल कंपनी’ या नावाने तेल उत्खननासाठी सन १८९९ मध्ये एक स्वतंत्र कंपनीच उभारली. ८० तेल विहिरींचा कारभार सांभाळत सन १९१७ पर्यंत ही कंपनी प्रगतशील राहील. यापुढे मात्र तेल उत्खननाचा कारभार उतरंडीला लागला. पण शास्त्रीय दृष्टीने शोध घेतल्यास या भूमीतून अधिक तेल उत्पादन करता येईल हे समजून ‘बर्मा ओईल कंपनीने’ ‘आसाम ऑइल कंपनी’ ला आपल्यात सामावून घेतले आणि हिंदुस्थानातल्या दिग्बोई येथील तेल विश्वाच अधिपत्य ‘बर्मा ऑइल’ कडे गेल. एकूणच जगातल्या पहिल्या तेल विहिरीनंतर अवघ्या सात वर्षांनीच भारतात दुसरी तेल विहीर जन्माला आली होती असा हा इतिहास आहे.! 

पुढे सन १९७३ च्या सुमारास अमेरिकेसारख्या बड्या राष्ट्रांच्या टिंगल टवाळीला प्रत्युत्तर देऊन भारतामध्ये ‘बॉम्बे हाय’ येथे ‘सागर सम्राट’ उभं राहिलं आणि तेलाच अस्तित्व कायम राहील.! 

सन २००४ सालाच्या अखेरीस तर ‘ओएनजीसी’ या भारतीय कंपनीने थेट रशियातल्या ‘युकोस’ या बलाढ्य कंपनीलाच हात घातला.! तोही इतिहास मोठा रंजक आहे.! असो ऐन जागतिक शर्यतीच्या वेळी नियतीने पारतंत्र्य आणि निसर्गाने तेलाचं दुर्भाग्य दिलं असलं तरीही हिंदुस्तान थांबला नाही.! कारण शर्यत संपली नाही, फक्त काळ बदलला आहे.! हेच इतिहासाचे मर्म आहे!!!

।।फक्तइतिहास।।

संदर्भ-हा तेल नावाचा इतिहास आहे

#faktitihas, #digboi


Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts