Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

पानिपत युद्धा पूर्वीचा जनकोजी शिंदे यांचा अतुल पराक्रम-





मित्रांनो स्वराज्य पासून तर मराठेशाही पर्यंत आपल्याला घरचे इतिहास लेखक दुर्लभ होऊन गेले. आपल्या वीरांच्या शौर्यगाथा ह्या शत्रु पक्षातूनच अधिक प्राप्त होतात.

"निगार नामाये हिंद"

हे गुलामअली नकवी याचे पुस्तक होय. यात पानीपतचे युद्ध त्याने तपशीलवार वर्णन केले आहे. गुलामअलीची आणि काशिराज यांची चांगलीच ओळख होती. काशिराजाच्या ग्रंथात न आलेली काही विशेष माहिती गुलामअलीच्या ग्रंथातून मिळते. ती म्हणजे पानिपत युद्धा पूर्वीचा जनकोजी शिंदे यांचा अतुल पराक्रम.!

पानिपतात मराठी आणि काही अंतरावर अहमदशाह अब्दाली आणि शूजा व नजिब रोहिला यांचे सैन्य असे आमने-सामने जणू प्रचंड महासागर एकमेकांवर आदळु पहात होते. दररोज त्यांच्यात लहान-मोठ्या चकमकी घडत होत्या. २२ नोव्हेंबर १७६० रोजी अहमदशहा अब्दालीचा वजीर शहावली खान हा आपल्या तुकडीसह गस्त घालीत पानिपताच्या आसमंतातील एका विहिरीजवळ पोहोचला. गिलचे पठाण आलेले पाहून हुशार असलेले जनकोजी बाबा आपल्या सैन्यासह विद्युत वेगाने शहावली वजीरावर चालून गेले. त्या विषयी गुलाम अली लिहितो- 

"दुपारी तिसऱ्या प्रहरी शहावलीखान हा थोडी माणसे घेऊन पानीपतजवळ एक विहिरीपाशी टेहेळणी करित गेला असता दक्षिणी लोकांनी त्याला पाहिले. त्यांच्याबरोबर थोडी माणसे आहेत असे पाहून ते त्याच्यावर तुटून पडले. त्यांच्याबरोबर पंधरा हजार स्वार होते. त्यांनी दुराणींना कोंडले. शहावली खानाने मोठ्या मर्दुमकीने त्यांचा प्रतिकार केला. दक्षिणी त्वेषाने लढले आणि त्यांनी शौर्याची शर्थ केली. दुराणींनी चांगलेच शौर्य गाजविले. पण त्यांचे अनेक लोक मृत्युमुखी पडले. उभय दळे एकमेकांत अशी मिसळली की धुळीमुळे शत्रुमित्र ओळखू येईनात. युद्धाच्या गोंगाटाने प्रळयकाळाचा भास झाला. शहावलीखानाचे सैन्य अल्प असल्यामुळे मुसलमानांची मोठी कठीण अवस्था झाली. ही बातमी अबदालीच्या छावणीत समजताच इकडून शुजाउद्दौला आणि नजीबखान यांनी आपली सैन्य आणि अहमदशहाचे थोडे सैन्य घेऊन शहावलीखानाच्या मदतीला धाव घेतली. शहावलीखानाचे सैन्ये पूर्णपणे कोंडले जाऊन निकराने लढत होते. मदत आल्याबरोबर त्याला हिंमत आली. संध्याकाळपर्यंत तुंबळ युद्ध झाले. एक-दोन घटकांच्या आत उभयपक्षाची तीन-चार हजार माणसे ठार अगर जखमी झाली. दुराणीची आणि शुजाउद्दौला व नजीबखान यांची मदत मिळाल्यामुळे शत्रूच्या सैन्याचे पाय डळमळू लागले. हे पाहून मुसलमानांनी त्वेषाने त्यांच्यावर चाल करून त्यांना हटविले. शहावलीखान रक्ताच्या समुद्रात रक्तपिपासू नरकाच्या दाढेत सापडला होता तो बाहेर पडला. दक्षिण्यांचा मोड झाला. शहावलीखान, नजीबखान वगैरेनी त्यांचा छावणीपर्यंत पाठलाग केला. आपला वजीर आणि अमीर सुखरूप आल्याबद्दल अहमद शहाने परमेश्वराचे आभार मानले."


जनकोजी शिंदे यांनी शहावली वजीरावर जबरदस्त हल्ला चढविला, त्यात वजीर मारला जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कसातरी आपला बचाव करीत वजीर उरल्यासुरल्या सैनिकांसह मुख्य छावणीकडे पळाला. जनकोजी बाबा आपल्या सैन्यासह त्याचा पाठलाग करीत अब्दालीच्या छावणीच्या आघाडीवर जाऊन आदळले.! मराठा छावणीतून जनकोजींना सरदार बळवंतराव मेहेंदळे यांची कुमक अपेक्षित होती. कदाचित ती मिळाली असती तर अबदालीची आघाडीत बरीच बिघाडी निर्माण झाली असती. मात्र जनकोजींना अधिक कुमक न मिळाल्याने व ऐन वेळी अब्दालीच्या छावणीतून शूजा व नजिब यांच्या सैन्याची कुमक मिळाल्याने वजीर बचावला!

असो, जनकोजींच्या या जबरदस्त प्रहाराने अब्दाली मात्र चांगलाच धास्तावला.!!

जनकोजींचे निस्सीम शौर्य अशा अनेक पराक्रमी घटनांमधून प्रकाशात येते. वीरांचे शौर्यतेज तसे लपत नाही आणि लपवता सुद्धा येत नाही.!

जनकोजी म्हणजे तारुण्यातला शौर्यसूर्य.! जो सूर्य आपल्या तेजप्रतापाने समग्र पृथ्वी प्रकाशून अल्पावधीतच अस्त पावला.!!!

त्रिवार मुजरा शिंदे घराण्यातील रानोजी, दत्तोजी, जनकोजी आणि महादजी या महायोद्ध्यांना.. पानिपतात सामील होणाऱ्या हरेक जंगेबहाद्दरांना.!!!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर

।।फक्तइतिहास।।

#janakojiscindia, #panipat, #faktitihas

Comments

Post a Comment

... मग कशी वाटली पोस्ट

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts