Skip to main content

Featured

नागझरी आणि दरेगाव येथील वास्तुशिल्पांची अनुभूती..

  मित्रांनो, या भारत भूमीवर प्राचीन सुंदर कलाकृती जगप्रसिद्ध आहेत, मात्र सामान्य दर्जाची, कमी कलाकृतीची दुर्लक्षित असलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणे आजही खेड्याबाऱ्मध्ये बरीच आहेत. अशा दुर्लक्षित इतिहास पुरुषांचा शोध मनाला नेहमीच असतो. आज बुलडाणा जिल्ह्यात फिरत असताना नेहमीप्रमाणे शोध घेतल्यावर समजले की शेंदुर्जनाच्या जवळ दोन ऐतिहासिक ठिकाणं आहेत. मग काय, आम्हाला इतिहासात टाईम ट्रॅव्हल करण्याची संधी चालून आली.! मित्रांनो,  शेंदुर्जन(सिंदखेड तालुका) येथून उजवीकडे वळून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर अंतरावर नागझरी फाट्यावरून डावीकडे वळलो. एक किलोमीटर अंतरावर नागझरी हा छोटा गाव लागला. या गावाच्या पिछाडीवर अतिशय खडतर रस्त्याने खाली उतरत एक किलोमीटर मोटर सायकलने गेल्यावर आम्ही डोंगराच्या कुशीत एका रमणीय ठिकाणास पोचलो. येथे एक प्राचीन महादेवाचे देवालय असून त्यासमोर धार कुंड आहे. देवालय बाह्य दर्शनी पाहिल्यास सुंदर कलाकृतीचे असून लहान लहान विटांनी बांधलेले दिसते. देवालयाचा जीर्णोद्धार झाला असल्याने मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. असो, देवालयात प्रवेश केल्यावर हेमाडपंथी बांधणीचे सहा दगडी स्तंभ दिसत...

अब्दालीचा पुत्र आणि कश्मीरी पंडिताची सत्वपरीक्षा...

 


कश्मीर भूमीमध्ये अनेक सत्तांतरे घडून आली ज्यामुळे तेथील धार्मिक वातावरण सतत बदलत राहिले. येथील मूळ हिंदू कश्मीरी पंडित बऱ्याचदा धार्मिक अत्याचाराने छळले गेले तरी ते विविध राजवटींमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध सरकारी हुद्यांवर केवळ नियुक्तच झाले नाहीत तर आपले धार्मिक स्वातंत्र अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरले.

काळातील बदल ओळखून त्यांनी फारसी भाषा अवगत केली. मोगलांच्या राजवटीमध्ये अकबराच्या काळात काश्मिरी पंडित प्रशासकांच्या हुद्यांवर काम करीत होते. काश्मीरचा प्रतिष्ठित अधिकारी आदित्य भट्ट होता. नूरजहांचा संरक्षक अधिकारी नेहरू नावाचा काश्मिरी पंडित होता. त्याने महाबतखानाच्या बंडातून जहांगीर आणि नूरजहाँ याची सुटका करविली.

औरंगजेबाच्या काळातही महेश शंकरदास पंडित हा काश्मीरमध्ये मोठ्या पदावर होता. औरंगजेबानंतर काश्मिरी पंडित चांगल्या जागांवर काम करीत राहिले. अहमदशहा अब्दालीच्या काळापासून काश्मीरमध्ये अफगाणांची राजवट सुरू झाली. पण फारसीवरील प्रभुत्व आणि विद्वत्ता ह्यांच्या बळावर ह्या पंडितांनी अफगाण दरबारातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले होते. काश्मीरच्या

सुभेदारांचे मुख्य सल्लागार कैलासधार पंडित आणि पंडित दिलाराम हे प्रमुख होते. दिलाराम ह्याला एकदा काबूल दरबारात बोलावण्यात आले. दिलाराम पंडित हा विद्वान आणि धर्मनिष्ठ होता. तो अफगान दरबारात दाखल झाला ते कपाळी गंध लावूनच.! 

त्याची पुढील आख्यायिका शेख अब्दुल्लांनी नमूद केली आहे :

काबूलचा बादशहा तैमूरशहा (अहमदशहा अब्दालीचा मुलगा) ह्याने त्याला विचारले,

"हे कपाळावर उभे गंध कशासाठी? "

दिलारामने न घाबरता उत्तर दिले, “परमेश्वर एक आहे हे दाखविण्यासाठी. "

तैमूरशहाने दुसरा प्रश्न केला, “कपाळाच्या दोन्ही बाजूंना गंध ते काय म्हणून?”

दिलारामने उत्तर दिले, “इस्लाम धर्माप्रमाणे कोणतीही घटना सिद्ध करण्यासाठी दोन साक्षीदार लागतात. परमेश्वर एक आहे हे माझे विधान. त्याच्या पुष्टीकरणासाठी हे दोन साक्षीदार आहेत. "

तैमूरशहाने शेवटचा प्रश्न विचारला. “गळ्यापाशी का गंध लावले? " दिलारामने न गोंधळता उत्तर दिले,

"माझ्या ह्या विधानावर विश्वास बसत नसेल तर माझा गळा ह्या ठिकाणी (जेथे गंध लावले तो भाग) खुशाल कापू शकता. " हे उत्तर ऐकून तैमूरशहा विचारात पडला, तोच दिलारामने दोन फारसी ओळी म्हटल्या :

बर चेहराअम नझर कुल व पिशाजीम ब दि

दागे गुलामिये शहा मौलास्त बर जबीम.

म्हणजे "माझ्या चेहऱ्याकडे पाहा आणि माझ्या कपाळाकडे नीट पहा. माझ्या कपाळावर तुला जो डाग (गंध) किंवा टिळा दिसतो तो मी परमेश्वराचा दासानुदास आहे हे दाखविणारा दास्यत्वाचा डाग आहे!”

पंडित दिलारामच्या वरील ओळींनी तैमूरशहा इतका प्रभावित झाला की, त्याने दिलारामवर अक्षरश: मोत्यांचा वर्षाव केला.

काश्मिरी पंडितांच्या बुद्धिमत्तेचे, चातुर्याचे आणि हजरजबाबीपणाचे हे उदाहरण कश्मीरच्या शेख अब्दुल्लांनी लिहून ठेवले आहे. अखेर शेख अब्दुल्लाही आपण स्वतः कश्मीरी पंडितांचे वंशज असल्याचे कबूल करतात. असो, पण ही कथा अब्दुल्लांची नाही. धर्मांतराच्या दुष्टचक्रात स्व:त्व टिकवू पाहणाऱ्यांच्या पराकाष्ठेची ही कथा आहे.!

-प्रा रवि आत्माराम बाविस्कर 

।।फक्तइतिहास।।

Comments

Followers चला माझ्यासोबत इतिहासाच्या वाटेवर..

Popular Posts